तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ- गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमानाच्या दिवशी आजही मध्यांन्ही देहूतील नांदूरकीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, असे म्हटले जाते. आम्ही जातो आमच्या गावा!! आमचा राम राम घ्यावा!! तुमची आमची हे ची भेटी!येथूनिया जन्मतुटी!! आता असो द्यावी दया! तुमच्या लागतसे पाया!! येता निज धामी कोणी! विठ्ठल विठ्ठल बोला वाणी!! राम कृष्ण मुखी बोला! तुका जातो वैकुंठाला!!तुकाराबीज जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा वैकुंठ गमन दिवस होय. इस 1609 मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीला त्यांचा जन्म झाला व इस 1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला, वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी ते भगवान पंढरीरायांच्या साक्षीने सदैव वैकुंठाला गेले, असे म्हटले जाते. महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात,ते घडविता येत नाही असे आपण समजतो. हा समाज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. भागवतभक्तीची पताका खांद्यावर घेऊनं आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. तुकोबाची अभंग वाचणारा प्रत्येक जण या वादळाने झपाटला जातो. तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकॊत्तर प्रतिभा आहे. चारचौघाप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दातून देत असतानाच भक्तीचे रहस्यहीउलगडून दाखविले. तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंश कुळी मोरे आणि आडनाव आंबिले. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एका मागोमाग एक आपत्ती कोसोळु लागल्या.सुस्थितीत असणाऱ्या तुकोबावर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात. तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देह त्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे.तुकोबा हरिचिंतनात निमंग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगा नुभवातून शब्दबद्ध केले.संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्यांचे मार्गदर्शन तुकोबा सारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही. स्वतः कटू अनुभवाचे हलाहल पचवून जगाला पटवून दिले.
“मराठी म्हणजे माऊली- तुकोबांची भाषा”, असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्याचसारखी अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी, त्यांची साक्षात वाड:मयिन श्रीमूर्तीच आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराज सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत.” धन्य म्हणवीन येह, लोकी लोका!अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठगमन करणारे, आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमाणसाला विठ्ठलभक्ती, सदाचरण,परोपकार इत्यादी सद्गुण मूल्याचेसुयोग्य मार्गदर्शन करणारे, भले तरी देऊ कासेची लंगोटी! नाठाळाचे माथी हाणू काठी!असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे,अत्यंत सडेतोड, परखड,पण त्याच वेळी मनाने अत्यंत सरळ, साधे,प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते.आजही या द्वितीयेच्या मध्यांनी देहूच्या इंद्रायणी गंगेच्या काठावरचा नांदूरकीचा पुरातन पावन वृक्ष श्री भगवंताच्या आगमनांची शकुनलक्षणे जानुन सळसळतो, पक्षीराज गरुडांच्या विशाल पंखाच्या फडात्काराने वाहणाऱ्या वायाच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो. इंद्रायणीच्या पुनीत काठही श्री भगवंताच्या दिव्यपदस्पर्शाने शहारतो, देवांना साक्षात समोर पाहून, विश्व व्यापून उरलेल्या तुकोबारायांच्या कंठ आजही तितकाच दाटतो, त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमवेगाने श्री भगवंताच्या चरणांना मिठी मारतात. नेत्रातून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मीमातेने सेवन केलेले, तेच पुण्य पावन श्री चरण पुन्हा एकदा धुवून काढतात, श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात. आणि तोच अवलौकिक अपूर्व- मनोहर, अद्वितीय वैकुंठगमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो.तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते विशिष्ट वर्गाची पारंपारिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला.संत तुकारामाचे अभंग महाराष्ट्राच्या परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसीक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतो. भागवत धर्माचा कळस होण्याचे महान भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने तुकोबा स्थिरावले.त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनिय आहे. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती पूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक नस्ट करण्याचा प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून, लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले.संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहे.संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहे. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन मध्ये पसरलेली धर्म -कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले.जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढलि. गुलामगिरीची चौकट मोडली.बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले.रामकृष्ण हरी….
संकलन :-शेषराव गो. कडू
वरुड मो. नं. 9923988734