spot_img

श्री गजानन महाराज प्रकटदिन औचित्याने- विसंगतीतून विनोद तर माणुसकीतून समाज निर्मिती- किशोर बळी

वर्धा-
“जगा सदाबहार… सहकुटुंब सहपरिवार” या विषयावर आयोजित व्याख्यानात हास्य, विनोद आणि सामाजिक व्यंगावर मर्मभेदी अचूक बोट ठेवत आपल्या अनोख्या विदर्भीय वऱ्हाडी शैलीत विसंगतीतून विनोद तर माणुसकीतून सशक्त व समृद्ध समाज निर्मिती होते असे वक्तव्य अकोल्याचे सुपरिचित कवी, गझलकार, निवेदक आणि वाणीत वऱ्हाडी बाज असणारे श्री. किशोर बळी यांनी केले.
श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त वैद्यकीय जनजागृती मंच, इंडियन रेड क्रॉस सोसायटी व द इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जगा सदाबहार… सहकुटुंब सहपरिवार” कार्यक्रमात बोलत होते.
वैवाहिक जीवनात घडणाऱ्या गमती जमती, लहान मुलांचे हरवत चाललेलं बालपण, विभक्त कुटुंब पद्धतीचे बालकांवर होणारे परिणाम, बोथट झालेल्या जाणीवा आणि सामाजिक चारित्र्य निर्मितीचा दुष्काळ या साऱ्या बाबी कुटुंबातील संवाद आणि संस्कारांच्या अभावाने घडत आहेत असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शिक्षणाची झालेली दुरावस्था, शिक्षकांची होणारी कसरत आणि राजकारणाचा घसरत चाललेला स्तर या साऱ्या विषयांवर सटीक शब्दात त्यांनी प्रहार केले, तर तितक्याच हळुवारपणे श्रोत्यांना विसंगतीचे वेगवेगळे किस्से सांगत हास्याचे फवारे देखील उडविले.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा, महात्मा गांधी, साने गुरुजी, महात्मा फुले यांच्या आदर्श शिकवणुकीतून समाज घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अधूनमधून बशीर बद्रचे शेर ऐकवून श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. समारोपात संविधानाच्या मूल्यांचे जतन व्हावे आणि सर्वांच्या आनंदाने आपणही आनंदी व्हावे असे मत कवी किशोर बळी यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात दीप प्रज्वलन व आरती करण्यात आली. चार्वी सचिन गरपाळ हिने गण गण गणात बोते या मंत्राचा साधा सरळ अर्थ उपस्थिताना उलगडून सांगितला, तर परी हर्षल पावडे हिचे प्रभू श्रीरामांच्या आगमनाचे बहारदार नृत्य केले.

आर्वी तालुक्यातील गट शेती करणाऱ्या व फार्मर कपमध्ये सहभागी दहा गटांचे व दोन युवा यशस्वी शेती उद्योजक सचिन पोहाणे व महेश पाटील यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या सन्मान कार्यक्रमात वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे, वर्धेचे तहसीलदार कोळपे व सेलूचे तहसीलदार स्वप्नील सोनोने, डॉ अरुण पावडे, अॅड. अशोक पावडे व डॉ. सचिन पावडे मंचावर उपस्थित होते. व्याख्याते श्री. किशोर बळी यांचा देखील शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

मुख्य अतिथी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कुपोषण मुक्त जिल्हा अभियानात डॉ. सचिन पावडे आणि सहकारी डॉक्टरांच्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन पावडे यांनी केले. शाम भेंडे यांनी श्री. किशोर बळी यांचा परिचय करून दिला तर शैलेश कराळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गाढवकर यांनी केले. यावेळी वर्धा जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मा. प्रियंका कर्डीले मॅडम व वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा. नरुल हसन सर आणि मॅडम यांनी कार्यक्रम स्थळी प्रमुख भेट दिली.

कार्यक्रमात वर्धेचे समाजातील विविध सामाजिक संघटनांचे सदस्य तसेच निमंत्रित मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय जनजागृती मंच, इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या